अंत्रोळीच्या सुपुत्राचा राज्यस्तरीय गौरव

पत्रकार समीर शेख ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित’

कंदलगाव दि १५ जून, ( प्रतिनिधी राहुल उडाणशिव ) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार सोहळा – २०२६’ रविवारी (दि. १४) जुळे सोलापूर येथील निर्मिती लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावचे सुपुत्र तथा दैनिक तरुण भारत संवाद चे पत्रकार समीर कासीम शेख यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पदक देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी दुग्धविकास कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य महादेवजी जानकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिवचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक (पुणे) प्रदीप गोरड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मनीषा माने, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील, अॅड. राजेंद्रप्रसाद धायगुडे, विवेक कोकरे, नागू विरकर, डॉ. स्नेहा सोनकाटे व डॉ. कीर्ती कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता, महिला सक्षमीकरण, युवक, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण व ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना महाराष्ट्र रत्न, महाराष्ट्र समाजरत्न, समाजभूषण, आदर्श व्यक्तिमत्त्व, आदर्श ग्राम, जीवनगौरव आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
ए. डी. फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक श्रीपती गोरड व कार्याध्यक्ष महादेव महानूर यांच्या नेतृत्वाखाली हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या पार पडला. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे संयोजन दिलीप वाघमोडे, दादासो गोरड, शरद माने, सागर म्हारनूर, राकेश पांढरे व शेडगे यांनी केले. कार्यक्रमास राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, समाजसेवक, पत्रकार, शिक्षक, उद्योजक तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार समीर कासीम शेख यांना प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल अंत्रोळी परिसरासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



