Nation

हद्दवाढ भागात नवे सबस्टेशन

धोकादायक वीजतारा हटविण्याचा निर्णय

सोलापूर,दि.03 ऑगस्ट,( द लोकतंत्र नेशन न्यूज नेटवर्क) : सोलापूर शहरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित, सक्षम आणि अखंडित करण्याच्या दृष्टीने हद्दवाढ भागात नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) उभारणे, धोकादायक वीजतारा हटविणे, भूमिगत केबल टाकणे, स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक सर्व्हिस वायर उपलब्ध करून देणे तसेच शहरातील विविध प्रलंबित वीजविषयक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.महावितरण होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीता केळकर यांच्या उपस्थितीत आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या प्रारंभी महापौरांच्या हस्ते नीता केळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.बैठकीस शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी ताई तडवळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता (शहर) विनायक इदायते, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक रवी कयावले, नगरसेवक भीमाशंकर केंगनाळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सहसचिव मल्लिकार्जुन कमटम, खजिनदार अंबादास भिंगी, संचालक नारायण आडकी, तसेच महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, महादेव इंगळे आणि मधुसूदन जंगम उपस्थित होते.बैठकीत हद्दवाढ भागात नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी आवश्यक मोकळी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. शहरातील अनेक भागांत घरांना लागून किंवा धोकादायक स्थितीत असलेल्या वीजतारा तातडीने हटवून आवश्यक ठिकाणी भूमिगत केबल टाकण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी दिल्या. नवीन केबल टर्मिनेशन, सर्व्हिस वायरची उपलब्धता, स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक विद्युत जोडण्या, धोकादायक विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर तसेच शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरील धोकादायक केबल हटविण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.अमृत योजनेअंतर्गत देसाईनगर येथील एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) पूर्ण झाल्याने तो कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ११ केव्ही विद्युत वाहिनी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच महानगरपालिकेच्या स्मशानभूमींमधील वीज सुविधांचे बळकटीकरण, आवश्यक ठिकाणी विद्युत जोडण्या उपलब्ध करून देणे, शहरातील एलईडी पथदिवे, पंपिंग स्टेशनचा अखंडित वीजपुरवठा आणि इतर तांत्रिक विषयांचाही आढावा घेण्यात आला.यावेळी नीता केळकर यांनी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेत आपल्या घरांवर रूफटॉप सोलर प्रणाली बसवावी, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा तसेच वीज वापर पारदर्शक, अचूक आणि कार्यक्षम होण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.शेवटी महापौर विनायक कोंड्याल यांनी शहरातील वीजपुरवठ्याशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका व महावितरण यांच्यात आवश्यक समन्वय ठेवून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button