
दक्षिण तालुक्यातील घटना : महसूल कर्मचाऱ्यांना संगणकाचा अभाव
दक्षिण सोलापूर (तालुका प्रतिनिधी राहुल उडाणशिव) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीचा निधी मिळाला नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांना संगणकाचा अभाव होय. याशिवाय शेतकऱ्यांच्या पंचनामेची माहिती अपलोड करताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून येते. परिणामी शेतकरी अतिवृष्टी निधी पासून वंचित आहेत. दक्षिण तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल कर्मचाऱ्यांना दिले होते. पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे बरोबर दिले असतानाही त्यांची माहिती सिस्टीमला अपलोड करताना चुकीची अपलोड करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी, आधार कार्ड आणि केवायसी लिंक असताना त्यांची माहिती चुकीची भरण्यात आली. एका शेतकऱ्याच्या फार्मर आयडी समोर दुसऱ्या शेतकऱ्याचे आधार कार्ड, एका शेतकऱ्याचे आधार कार्ड त्यासमोर दुसऱ्या शेतकऱ्याचा बँक अकाउंट नंबर अशी चूक करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांच्या नावातही बदल केले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. अतिवृष्टीचा निधी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी महसूल कर्मचाऱ्यांना विचारले असता सिस्टीमचा दोष असल्यास सांगत जबाबदारी झटकून दिली. चुकीची माहिती अपलोड करण्यास कोण जबाबदार आहे? असा सवाल शेतकरी करत आहे. यावरून असे दिसून येते की महसूल कर्मचाऱ्यांनाच संगणक ज्ञानाचे अभाव असल्याचे शेतकऱ्यांनी सांगतात.राजकुमार बिराजदारचे झाले प्रिन्स बिराजदार विंचूरचे शेतकरी राजकुमार गजानन बिराजदार या नावाने अतिवृष्टीच्या पंचनामेचा अर्ज भरून दिला होता. तसेच राजकुमार अण्णासाहेब म्हेत्रे यांचेही प्रिन्स अण्णासाहेब म्हेत्रे असे झाले आहे. असेच अन्य काही शेतकऱ्यांचे काना, मात्रा, वेलांटी चुकीच्या पद्धतीने भरली गेली आहे.




