जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक

धाराशिव दिनांक 15 (प्रतिनिधी सुरज थोरात)
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी निवडणूक काळात शांतता व सुरक्षितता राखण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले.या बैठकीत आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, अनधिकृत बॅनर व फलक काढून टाकणे, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मोबाइल बंदी, तसेच पथकांमार्फत प्रभावी कारवाई यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.पोलीस अधीक्षक ऋतू खोखर यांनी निवडणूक काळात निष्पक्षतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच शस्त्रजप्ती, प्रतिबंधात्मक कारवाई व संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




